Tuesday, February 07, 2006

जाता जाता सहजच

आपणही आरंभशूर ठरतोय की काय असं वाटायला लागलं होतं.. ब्लॉगची सुरुवात तर उत्साहात केली होती पण नंतर मात्र गाडी अडकली.. पण काल सचिनने ज्या मनोनिग्रहाने ( बापरे! केवढा जड शब्द!! ) शतक मारले त्या मनोनिग्रहाने मला विचार करण्यास भाग पाडले..

मी नियमीतपणे ब्लॉग नाही लिहू शकत कारण ऑफिसात कामाचा ताण, घरी छकुलीची गडबड.. असो कारणं एक ना अनेक.. विचाराअंती एवढेच जाणवते की ब्लॉगवर लिहिणे ही माझी priority नाहिये हेच खरं कारण आहे.. ऑफिस, छकुली ही सारी निमित्तं आहेत..

एखादी गोष्ट न करण्याला अगणित कारणं असू शकतात पण ती गोष्ट करायला ती गोष्ट करायचीच आहे एवढे एक कारण पुरेसे असते.. तर असो याच मनोनिग्रहाने मी ब्लॉग अपडेट ठेवायचे ठरवले आहे.

काल सचिनने एक दिवसीय सामन्यातील एकोणचाळिसावे शतक पूर्ण केलं. गेल्या आठवड्यात कराची कसोटी सामन्यानंतर " नेमेची येतो पावसाळा " प्रमाणे सर्व प्रसार माध्यमांनी एकच हाकाटी सुरु केली " सचिन संपला " . मला खात्री होती की दरवेळेप्रमाणेच सचिन तोंडाने न बोलता त्याच्या खेळीनेच उत्तर देणार आणि काल त्याचे शतक झाले. दुसरा एक मैलाचा दगड त्याने काल पार केला तो म्हणजे एकदिवसीय सामन्यात चौदा हजार धावांचा टप्पा त्याने ओलांडला.

सचिन एखादी इनिंग खेळला नाही की प्रसारमाध्यमे त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरु करतात. सचिन संपला अशी आवई उठवतात. opinion polls चे पीक येते. परवा तर एका वाहिनीने त्यांची खेळणार्‍या अकरा खेळाडूंची यादी तयार केली त्यात सचिनला स्थान नव्हते. ही सचिनची अवहेलना नसून त्या वाहिनीने स्वतःचे करुन घेतलेले हसू होते. असो त्यांना त्यांची भाकरी भाजून घेण्यासाठी असे तवे पेटवावेच लागतात.

सचिन हा महान खेळाडू आहे हे नव्याने सांगण्याची गरजच नाहिये. वाढत्या वयोमानानुसार आणि दुखापतीमुळे तो एक ना एक दिवस निवृत्त होणार हे सुद्धा नक्की. सचिन परत पुर्वीच्या भरात येणार नाही हे सत्य आहे. पण तो एवढा परिपक्व आहे की हे निर्णय तो स्वतः घेईल, योग्य वेळेस घेईल. कुठल्याही विक्रमाची वाट बघत त्याला संघात खेळवण्याची आवश्यकताच भासणार नाही. तो स्वतः कधीच विक्रमासाठी खेळला नाही. तो खेळत गेला आणि विक्रम त्याच्या पायाशी लोळण घेत गेले.

सचिनने त्याच्या झंझावाताची इतकी सवय लावली होती की त्याचे आता झुळुकी सारखे येऊन प्रसन्न करुन जाणे लोकांच्या पचनी पडत नाहिये. कोणत्याही गोष्टीचे व्यसन वाईटच. सचिनने आम्हाला त्याने केलेले विक्रम बघायचे व्यसन लावले.भारतीय संघ खेळत असताना, अकराजण शरीराने सामना खेळत असतात तर कोट्यवधी लोक तेंव्हा मानसिक सामना खेळत असतात. मोठी स्वप्न रचत असतात. सचिनसारख्यांनीच जनतेला मोठी स्वप्न पाहायची सवय लावली हाच कदाचीत त्यांचा दोष असू शकतो.

सचिनच्या तंत्रावर बोलण्याची माझी पात्रता नाही परंतू सध्या निरीक्षणातून एक गोष्ट लक्षात आली ती अशी की सध्या तो half-cock खेळतोय. जे त्याला त्रासदायक ठरतंय. bat-pad मध्ये gap राहून तो सध्या वारंवार त्रिफळा बाद होतो. कालही नावेदच्या एका चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला परंतू सर्वांच्याच सुदैवाने तो नोबॉल होता. आणि अशी ही सुदैवाची कुबडी सचिननं घेणं हीच गोष्ट पचनी पडत नाही. टेनिस एल्बो ची दुखापत असेल किंवा अजून काहिहि कारण असेल त्याचे या तंत्राने खेळण्यामागे पण ते सदोष आहे असं मला वाटते. असो.

सचिन हा उर्जेसारखा आहे. जो संपणार नाही.. कदाचीत उर्जेसारखाच एका अवस्थेतून दुसर्‍या अवस्थेत त्याचे रुपांतर होईल......

2 comments:

Nandan said...

सचिनने त्याच्या झंझावाताची इतकी सवय लावली होती की त्याचे आता झुळुकी सारखे येऊन प्रसन्न करुन जाणे लोकांच्या पचनी पडत नाहिये. कोणत्याही गोष्टीचे व्यसन वाईटच. सचिनने आम्हाला त्याने केलेले विक्रम बघायचे व्यसन लावले.भारतीय संघ खेळत असताना, अकराजण शरीराने सामना खेळत असतात तर कोट्यवधी लोक तेंव्हा मानसिक सामना खेळत असतात. मोठी स्वप्न रचत असतात. सचिनसारख्यांनीच जनतेला मोठी स्वप्न पाहायची सवय लावली हाच कदाचीत त्यांचा दोष असू शकतो.

--- agree completely

Sharvari Patankar said...

though not a cricket fan myself, liked ur article, especially the beginning...MANONIGRAHA :)