Saturday, September 30, 2006

Friday, June 30, 2006

मेघ

दरवर्षी पाऊस येतो
चिंब चिंब बरसून जातो
दरवर्षी मी मेघदूतातल्या
माझ्या मेघाची वाट बघतो... अन..

इवलासा एक काळा ढग
माझ्यासमोर उभा राहतो
मऊशीर हातानी अलगद
मला कवेत घेऊ पाहतो॥ मग॥

पावसासंगे गोफ विणत
मी ही दूर फिरुन येतो
नदी नाले झाडाझुडपांत
ओल्या आठवणी रित्या करतो

सरींच्या तालावर नाचतो
रानी-वनी खूप बागडतो
चिंब होऊन दमल्यावर
हळूच घरी परत येतो॥ नंतर..

सताड उघड्या खिडकींतून
उनाड पाऊस आंत येतो
शांत बसल्या माझ्याशी
अवखळ लगट करु पाहतो

कितीही दूर लोटलं तरी
पुन्हा पुन्हा जवळ येतो
हसून मग मी ही त्याला
माझ्या डोळ्यांत साठवून घेतो.....

दरवर्षीच्या पावसाळ्यात
हे असंच काहीसं होतं
दरवर्षी आतुरलेलं मन
माझ्या मेघाची वाट बघतं.......

Friday, May 19, 2006

माझी छकुली

" इज इट अभि? "
" येस. स्पिकिंग. "
" अभि कॉल फॉर यू "
" प्लीज ट्रान्स्फर इट. थॅंक्यू. "
......
" हॅलो, अरे रुपाली बोलतीय. "
" हॉस्पिटलमध्ये निघालायत का? "
" अरे! अभिनंदन!! आपण दोघे आई - बाबा झालो. तुझाच अंदाज बरोबर ठरला. मुलगी झाली. पंधरा मिनिटे झाली. नॉर्मल झाले. सात पौंड आहे वजन. गोड आहे रे एकदम!! तू कधी निघतोयस? "
" कधी काय लगेच निघतोय!! "
......

आज या रोमांचकारी क्षणाला एक वर्ष पूर्ण झालं. मला उगाच टेन्शन नको म्हणून सौभाग्यवतींनी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायच्या आधी मला कळवलेच नव्हते. त्यामुळे त्या अद्भुत अनुभवाला मी मुकलो. अर्थात आम्ही आई बाबा होणार हे समजल्यापासून ते आजतागायत अनेक रोमांचकारी आणि सुखद अनुभव आम्ही जगलोय. प्रत्येक " पहिल्या " गोष्टीची मजा काही निराळीच असते.

त्या चिमुकल्या जीवाचं पहिलं " दर्शन " आम्हाला पहिल्या सोनोग्राफीच्यावेळी झाले. वीत-दीड वीतीचा तो जीव हालचाल करताना बघून काय वाटलं ते खरंच शब्दात मांडणे अवघड आहे. आम्ही दोघे तो जीव पोटात असल्यापासूनच त्याच्याशी खूप गप्पा मारायचो. आणि तो जीवही त्याच्या पद्धतीने त्याला प्रतिसाद द्यायचा. त्याची ती होणारी हालचाल, आतून मारलेल्या ढुश्या म्हटलं तर थोडसं त्रासदायक वाटणारा पण तरीही हवा हवासा वाटणारा तो अनुभव ही प्रत्येक माताच जाणे. ते सुख पुरुषाच्या नशिबी नाहीच. तर दिसामाजी योग्य ती प्रगती करत तो जीव रुढार्थाने या जगात प्रवेश करण्याइतपत पक्व झाला. इथेच त्या जीवाने खट्याळपणाची पहिली चूणूक दाखवली. डॉक्टरीण बाईंनी अंदाज वर्तवला की साधारणतः अपेक्षीत दिवसाच्या अंदाजे पंधरा दिवस आधीच आमचं बाळ या जगात प्रवेश करेल. आम्ही सर्वजण त्या नव्या जीवाच्या, आमच्या बाळाच्या स्वागताला तयारीत होतो. पण अखेर " ती " मात्र अगदी ठरल्या दिवशीच या जगात प्रवेशती झाली. " आतुरता " या शब्दाचा पुरेपूर अर्थ आम्हाला त्या दिवसांत समजला.

गेले वर्षभर सईच्या बाललीला आम्ही दोघे समाधानाने अनुभवतोय. खरंच प्रत्येक मूल हे स्वतःच्या आई-बापाला त्यांचं सरलेलं बालपण जगायची पुन्हा एक संधी देत असतं फक्त पालकांचा दृष्टिकोन तसा असायला हवा. तिच्या हुंकार देण्यापासून ते आताच्या खास तिच्या भाषेतल्या बडबडीपर्यंत, तिच्या कुशीवर वळण्यापासून ते आताच्या दुडुदुडू चालण्यापर्यंत सर्व क्षण मी पुन्हा एकदा जगलो. आता हे सर्व क्षण कॅमेरात चित्रबद्ध आहेतच पण तरी ते अक्षरशः पुन्हा जगण्याचा जो अनुभव आहे तो निराळाच. अर्थात त्याचबरोबर आपण " बाप " झालो आहोत याचंही भान ठेवावं लागतं. गेले वर्षभर " पालक " म्हणून बर्‍याच गोष्टी आम्ही शिकल्या, अनुभवल्या अन पुढेही शिकत राहूच.

आज सई वर्षाची झाली हे खरंच वाटत नाहिये. खूप लवकर काळ सरकल्याचा भास होतो आहे. अर्थात सर्वच चांगल्या गोष्टी घडताना असंच वाटत राहतं. आज तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा, आशिर्वाद यांनी ती उत्तरोत्तर मोठी होत जाईल. पण आज तिचा " बाबा " म्हणून तिला आशिर्वाद देताना देवाजवळ एवढीच प्रार्थना करतो की तिला चांगलं माणूस म्हणून घडवण्याचे बळ माझ्या पंखात सदा राहो...

Monday, April 03, 2006

अनुभूती

मी अस्तिक आहे की नास्तिक मलाही नीटसं माहित नाही. मुंज झाल्यावर १० वर्षे नेमाने संध्या पाठ केले पण नंतर अचानक बंदही केले. इतकंच काय गळ्यातून जानवं पण गायब झालं. अजूनही मी नेमाने देवळात जातो पण घरी देवपूजा करत नाही. या सर्व गोष्टी अशाच करायच्या म्हणून ठरवून करत नाही मी. जे मनाला पटते, जिथे समाधान मिळते त्या गोष्टी मी करतो.

माझे बाबा मात्र खूपच धार्मिक होते. पण त्यांनी कुठल्याही गोष्टीची माझ्यावर सक्ती केली नाही. नित्य नेमाने देवपूजेपासून ते गौरी गणपती, नवरात्रा पर्यंत सर्व गोष्टी त्यांनी मनोभावे घराण्याच्या परंपरेनुसार सोवळे ओवळे पाळत केल्या. घरी दर वर्षी सत्यनारायणाची पूजा आणि गणपती अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तने पण असतात. त्यापैकी सहस्त्रावर्तने अस्मादिकांचा जन्म झाल्यावर कुणीतरी बाबांना माझ्यासाठी करावयास सांगितली. आणि एकाही वर्षाचा खंड न पडता त्यांनी ती केली. त्यांच्या मागे मला हे सर्व कितपत जमेल याबद्दल मी थोडा साशंकच होतो पण मलाही ते विनासायास जमून जातय.

मागच्याच आठवड्यात सालाबादप्रमाणे सहस्त्रावर्तने झाली. बाबांच्यानंतर मी आवर्तने करण्याचे यंदाचे हे तिसरे वर्ष. आमचे गुरुजी त्यांच्याकडे वेद शिकणार्‍या दह मुलांना घेऊन दरवर्षी येतात आणि अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम होतो. एक हजारावं आवर्तन उपस्थित सर्वजण उच्चारवात म्हणतात. गेली तीनही वर्षे त्या शेवटच्या आवर्तनात मला माझ्या बाबांचा आवाज ऐकल्याचा भास होतो. याला भास म्हणावे की अनुभूती माहित नाही पण तोच आवाज, तसेच स्पष्ट उच्चार.. जणू ते तिथे माझ्या शेजारीच असावेत..

मी म्हटलं तसं की आठवणींच्या रुपात ते कायमच माझ्या बरोबर असतात पण ते असे कधी कधी भेटून जातात...

Tuesday, March 28, 2006

ती

शेवटच्या वर्षाची परीक्षा नुकतीच संपली होती. कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूज चालू होते. प्रत्येकाची पुढं काय करायचं याची तयारी सुरू होती. अन अचानक एक दिवस आमच्या ग्रुपमध्ये गोव्याला ट्रिपला जायची टूम निघाली. कारण नंतर कोण कुठल्या वाटेने जाईल माहित नाही. आयुष्यात पुन्हा अशी मजा एकत्रपणे करता येईल की नाही हे ही ठावूक नव्हते. त्यामुळे गोव्याला जायचे आणि मनसोक्त आनंद लुटायचा हे ठरले होते.

ठरल्या प्रमाणे आम्ही सगळे गोव्यात दाखल झालो. वेळेचं कोणतेही बंधन नको असल्याने साईट सीईंग वगैरे काहीच प्लॅन्स नव्हते. कधीही उठायचे, समुद्रात डुंबायचे, बीचवर लोळायचे, खायचे,प्यायचे पुन्हा कंटाळा आला तर पुन्हा समुद्र.. एकदम धमाल चालू होती.

अन एक दिवस एका टपरीवर " ती " दिसली. गोरी गोमटी, वार्‍यावर उडणारे मोकळे भुरे केस, कमनीय बांधा, आणि आवश्यक ती सर्व अंग प्रत्यंग म्हटलं तर झाकलीयत्; म्हटलं तर उघडीयत असा टॉप आणि स्कर्ट अशा पेहरावात ती समोर उभी होती. स्वतःच्या सौष्ठवाची तिला चांगलीच जाण असल्याचे एकंदरीत तिच्या देहबोलीवरून दिसत होते. प्रथम ती आलेल्या गिर्‍हाईकांमधलीच एक आहे असा समज झाला होता पण नंतर लक्षात आले की ती टपरीची मालकीण असावी. प्रत्येकाशी ती हसून, आपलेपणानं वागत होती. हासताना ती खूपच सुंदर दिसत होती. क्षणभर आत कुठेतरी काहीतरी झालं. असं एकटक तिच्याकडे बघतानाच ती आमच्या जवळ आली, सांगितलेली ऑर्डर लिहून घेऊन निघून गेली. ती जवळून जाताना एक मंद सुवास माझ्याजवळ रेंगाळून गेला. माझी नजर तिच्यापाठोपाठच फिरत होती. नंतर माझ्या लक्षात आले की खूप सार्‍ई गिर्‍हाईकं तिच्याकडे असंच रोखून पहात होती. एक दोन गिर्‍हाईकांनी तर तिला नजरेनेच खुणावले. ती त्यांच्याकडे बघून हासली. थोडं विचित्र वाटलं, मन थोडं खट्टू झालं पण नंतर ती नेहमी येणारी मंडळी असतील असं म्हणून मी पुन्हा तिच्याकडे पाहू लागलो.

मग दुसरे दिवशीपण मी त्याच टपरीवर गेलो. खाणं पिणं झालं तरी तिथेच रेंगाळलो. एव्हाना ग्रुपमधल्या बाकीच्यांच्या पण ही गोष्ट लक्षात आली होती. पण त्यांनी चेष्टेवारी ती गोष्ट सोडून दिली. आमचे तसे काहीच खास प्लॅन नसल्यामुळे मी तिथेच रेंगाळलो तरी कुणाला काहीच फरक पडणार नव्हता. मी बारकाईने तिचं निरीक्षण करत तिथेच रेंगाळू लागलो. तिच्या त्या मोहक हालचाली बघितल्या की धडधड वाढायची. तिथेच रेंगाळलो असलो तरी तिने माझी अशी विशेष दखल घेतली नव्हती. थोड्यावेळाने तिथे एक ग्रुप आला. तिने नेहमीप्रमाणेच त्यांचे स्वागत केले. त्या ग्रुपमधील एक दोघे जण तिच्यावर कॉमेंट्स करत होते. मला त्यांचा राग येत होता पण मी काही करू शकत नव्हतो. पण नंतर एकाची मजल चहा देताना तिचा हात धरण्यापर्यंत मजल गेली. अन मी न राहवून आवेशातच तिथे गेलो. तिच्या ते लक्षात आले अन तिने मला हातानेच अडवले. नुसतेच अडवले नाही तर तिच्याबरोबर तिथून घेऊन गेली.
" सायबा राहू द्या हो. कुणा कुणाचा हात धराल? अन कितीजणांशी भांडाल? मला सवयचीच आहे हे. तुम्ही बसा काय देऊ तुम्हाला? "
" अं... नको काही नको. "

मी तिथून बाहेर पडलो. मी तिला मदत करायला गेलो होतो पण ती मला साधे Thanks पण म्हणाली नव्हती. उलट हसून मलाच तिने समजावले. मी जास्तच विचार करतोय असं ग्रुपमधल्या बाकीच्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी मला समजवायचा प्रयत्न केला. त्यादिवसापुरता मी तो विषय डोक्यातून काढून टाकला.

तिसरे दिवशी थोडं आड वेळेलाच मी पुन्हा तिच्या टपरीकडे जाऊ लागलो. टपरीवर गर्दी नसल्याचे लांबूनच दिसत होते. आज टपरी बंद आहे की काय अशी शंका आली. तरी नेटाने पुढे गेलो. टपरीच्या अलिकडेच थोडा पोचलो असतानाच कोणाचा तरी विनवण्या केल्याचा आवाज कानावर आला.
" सायबा असं नका करु. असं नका जाऊ "
" मग काय करु? तो पांगळा त्याच खोलीत पडलाय अन... "
" नाय सायबा तो काही त्रास देणार नाही. मी गोधडी टाकीन त्याच्या अंगावर. तोंड बांधून ठेवीन त्याचं. काही करणार नाही तो, काही बोलणार नाही तो.. ये सायबा ये.. चार पैसे मिळाले तर त्याला मोठ्या डॉक्टरला दाखवता येईल... "
" हुड... "
मी तिचा आवाज ओळखला होता. अन ते थरारक दृश्य मला दिसले. एक रांगडा उंच मनुष्य जात होता अन ती त्याच्या पायाला धरुन त्याची विनवणी करत होती. तिच्या विनवण्यांकडे लक्ष न देता तो तसाच पुढे चालला होता. तिने त्याच्या पायाला धरले असल्याने ती थोडीशी फरफटली. तरी तो निघून गेला. मी पण परत जायच्या विचारात असतानाच तिचे माझ्याकडे लक्ष गेले.
" सायबा. ये. माझ्याकडेच आला होता ना? "
" ..... "
" ये ना. जास्त पैसे नाही घेणार. "
" नाही मी त्यातला नाहिये. पण हे घे. " मी खिशातून थोडे पैसे काढून तिच्या समोर धरले.
" सायबा भिक नकोय मला. ते पैसे ठेव तुझ्याकडेच. "

मी जड मनाने तिथून गेलो. ती " तसली " असेल अशी थोडीसुद्धा कल्पना नव्हती. पांगळ्या भावाच्या इलाजाकरता ती हा उद्योग करत होती. त्यादिवशी स्वतःच्या संवेदना कुस्करुन भावाचा इलाज करण्याचा तिचा " स्वाभिमान " मला माझ्या " नैतिकते " पेक्षा मोठा वाटला...

Saturday, March 18, 2006

निमित्त मात्र

सूर्योदयाच्या वेळी
पूर्वेला तांबडं फुटतं
एक किरण बनून
आकाश उजळवासं वाटतं
...प्रत्येकवेळी उजळवणं मात्र जमतंच असं नाही
...माझ्याशिवाय सूर्याचं उगवणंही थांबत नाही

फुलांचा ताटवा
मन माझं फुलतं
छोटसं फुलपाखरू बनून
मधुरस टिपावंस वाटतं
...प्रत्येकवेळी टिपणं मात्र जमतंच असं नाही
...माझ्याशिवाय फुलांचं फुलणंही थांबत नाही

निळं - तांबडं आकाश
नेहमीच मला खुणावतं
स्वच्छंदी पक्षी बनून
उंच उडावंस वाटतं
...प्रत्येकवेळी उडणं मात्र जमतंच असं नाही
...आकाश जवळ भासलं तरी क्षितिजाला टेकत नाही

काळीज भरभरुन
सारखं लिहावस वाटतं
इवलासा शब्द बनून
कविता जगावंस वाटतं
...प्रत्येकवेळी जगणं मात्र जमतंच असं नाही
...मरण भेटेपर्यंत आयुष्यही जगायचं थांबत नाही

Saturday, February 25, 2006

पुन्हा एकदा..

लाचार काया
तुटतो जीव
गात्रांचे पडघम
पुन्हा एकदा

भुकेला तान्हा
बाळमुठी चोखे
आटलां पान्हा
पुन्हा एकदा

देहात नशा
नजरेत विखार
स्पर्षलोलूप नर
पुन्हा एकदा

उमलतां रात्र
समर्पिते देह
त्याच वणव्यात
पुन्हा एकदा...

Wednesday, February 15, 2006

बोच

" अरे! पाट्या?? ओळखलंस का मला? " लक्ष्मीरस्त्यावरच्या गर्दीतून वाट शोधत मी माझ्याच तंद्रीत चाललो होतो. अन अनपेक्षितपणे कोणीतरी माझ्या खांद्यावर हात टाकून मला थांबवले. मी त्याच्याकडे थोड्या नाराजीनेच पाहिले. खरंतर मला टिळक स्मारकला " आयुष्यावर बोलू काही " चा प्रयोग गाठायचा होता. बाईकने ऐनवेळेस धोका दिल्यामुळे चालत चाललो होतो अन हा कोणी अनामिक इसम माझी वाट अडवून दत्त म्हणून उभा होता.

" काय ओळखलंस का? "
"...."
मी अजूनही संभ्रमावस्थेत होतो. एकतर मला उशीर होत होता आणि हा इसम मला इथे कोडी घालत होता.
" किती वर्षांनी भेटतोय लेका. तेसुद्धा पुण्यात, असे अचानक... "
त्याच्या चेहर्‍यावरचा आनंद लपत नव्हता. त्याच्या बोलण्याच्या लकबीवरून तो सातार्‍याकडील असावा असा अदमास मी मनात बांधत होतो. पण तो कोण हे काही आठवत नव्हते. मी थोड्याशा रुक्षपणेच त्याला ओळखले नसल्याचे कबूल केले. माझी अजून परीक्षा न बघता त्याने स्वतःची ओळख करुन दिली.
" अरे मी मनोज नाईक.. शाळेत आठवी पर्यंत आपण बरोबर होतो... "
त्याने नांव सांगताक्षणी माझ्या डोक्यात प्रकाश पडला, अंगावर नकळत काटा आला. मला एकदम सोळा - सतरा वर्षांपूर्वीचा " मन्या " आठवला.

मनोज नाईक.. किडकिडीत शरीरयष्टी, कायमच वाढलेले थोडेसे कुरळे केस, रंग काळसर सावळा, वरचे दोन दात थोडे पुढे आलेले.

तसं आम्ही दोनच वर्षे एका वर्गात होतो. पाचव्या इयत्तेत मन्या आमच्या वर्गात आला. कोणी त्याची विशेष दखल घ्यावी असे कोणतेच गुण त्याच्यात नव्हते. सातवीत गेल्यानंतर शाळेत वारंवार गैरहजर राण्यावरुन त्याला आमच्या वर्गशिक्षकांनी एकदा सर्वांसमोर ताकीद दिली होती. त्याचा राग मनात धरुन तो भर वर्गातून निघून गेला होता. आमच्या वर्गशिक्षकांसह आम्हा सर्वांनाच तो मोठा धक्का होता. मुख्याधापकांनी त्याला ताकीद देऊन पुन्हा वर्गात बसायची परवानगी दिली होती. पण त्यानंतर दमदाटी, किरकोळ भांडणे, मारामार्‍या यावरुन मन्या सगळ्यांच्याच परिचयाचा झाला. शाळेतली वरच्या वर्गातली मुले सुद्धा त्याला वचकून असत. आम्हाला तर वर्गात बर्‍याचदा त्याची दादागिरी सहन करायला लागायची. पुढे आठवीत गेल्यावर गुणक्रमानुसार त्याची तुकडी बदलली आणि आम्हाला थोडं हायसं वाटलं होतं. पण आठवीची शाळा सुरु झाल्यावर थोड्याच दिवसांत शहर पोलीसांनी त्याला एका गुन्ह्यात संशयीत आरोपी म्हणून पकडलं आणि त्याची शाळेतून कायमची हाकालपट्टी झाली. त्याच्या घराच्या आसपास राहणार्‍या काही मुलांकडून त्याला नंतर रिमांड होम मध्ये ठेवल्याचे समजले. त्यानंतर मन्याचा आणि आमचा कधी संबंधच आला नाही. कालांतराने तो आमच्या विस्मृतीतसुद्धा गेला. मन्या बालगुन्हेगार कसा बनला? त्याच्या घरची background काय होती हे प्रश्न आम्हाला कधी पडलेच नाहीत. आणि आज तोच मन्या माझ्यासमोर उभा होता.

" आता तरी ओळख लागली का? "
" हो. "
मी थोड्याशा तुटकपणे म्हणालो.
" अरे वा! नशीब आमचं. तुम्ही पुढे बसणारी मुलं. त्यात तू तर तबला वाजवण्यामुळे शाळेत famous . काही बदल नाही झाला रे तुझ्या चेहर्‍यात. लगेच ओळखलं बघ मी तुला एवढ्या गर्दीतसुद्धा "
तो उत्साहाने बोलत होता आणि मी कसंनुसं हासल्यासारखं करत होतो.
" मग अजून तबल बिबला वाजवतोस ना? काय करतोस सध्या? तसं तुझ्याकडे पाहून तरी मोठा साहेब असशील असं वाटतंय. लग्नबिग्न झालंय की नाही? "
त्याची प्रश्नांची सरबत्ती सुरूच होती. माझ्या कपाळावर आता सूक्ष्म आठ्या उमटायला सुरुवात झाली होती. पण तरी त्याच्या एखाद्यातरी प्रश्नाचे उत्तर देणे मला भाग होते म्हणून शक्य तेवढा कोरडा स्वर ठेवत मी त्याला उत्तरे देत होतो.
" अरे तबला ना चालु आहे आपलं जमेल तसं. बाकी व्यापात तसा वेळच मिळत नाही म्हणा... "
" अरे मी भोसरीला एका छोट्या कंपनीत फिटर म्हणून कामाला आहे. निगडीला दोन खोल्या घेतल्यात भाड्याने. मी बायको आणि छोटी मुलगी राहतो तिथे. सहा महिन्यांपुर्वी आई वारल्यापासून अण्णाही माझ्याकडेच असतात. "
खरंतर त्याच्या कुटुंबीयांबद्दल मला कधीच माहिती नव्हती. पण उत्साहाच्याभरात हे त्याच्या लक्षातही आले नव्हते. तो बोलतच होता.
" आठवीत शाळा सुटली. रिमांडहोममध्ये गेलो. तिथेही शिकण्यात रस नव्हताच. तिथेही उनाडक्याच जास्त करायचो. पण नशिब चांगले म्हणून काजरेकर सर भेटले आणि मी करत असलेली चूक समजली. ठरवलं की आपणपण चांगला माणूस व्हायचं. अरे आपल्या शाळेतही खूप चांगले शिक्षक होते जे मला तेंव्हा समजवायचे पण कसली मस्ती चढली होती मला कुणास ठावूक. पण काजरेकर सरांनी आयुष्याला दिशा दिली. त्यांच्याच सांगण्यावरून मग फिटरचा कोर्स केला. "

तो सांगत असलेल्या कुठल्याही गोष्टीचा मला संदर्भ लागत नव्हता. ना मला त्यात रस होता. मला आता त्याचा राग यायला लागला होता. त्याने पुन्हा संभाषणाची गाडी पुढे रेटली.
" अरे तू काय करतोस हे सांगितलेच नाहीस. कुठे राहतोस? आणि लग्नाची गोष्टही अगदी सोईस्कर टाळलीस की रे सांगायची.. ए तुला वेळ असेल तर चल ना कुठेतरी कटिंग मारूयात. "
त्याच्या अश्या सलगीच्या बोलण्याचा मला खूप राग आला होता. त्या तिरीमिरीतच मला त्याच्यातले आणि माझ्यातले अंतर त्याला दाखवून द्यायची असुरी इच्छा झाली. मी जरा तोर्‍यातच सांगितले
" मी एका software कंपनीत आहे कामाला. आणि कोथरूडला माझा स्वतःचा ५ रुम्सचा फ्लॅट आहे. " तेवढ्यात माझा सेलफोन वाजला. त्याला दाबायची अजून एक संधी साधत मी मोठ्या दिमाखात माझा महागडा सेलफोन काढून त्याच्या समोर नाचवत बोललो. आणि तीच सबब मला आत्ता वेळ नाही पुन्हा जाऊ कधीतरी चहा प्यायला म्हणून ठोकून दिली.

या सर्वाच्या त्याच्या चेहर्‍यावर थोडा परीणाम झालेला दिसला. थोडसं ओशाळवाणं हासून त्याने त्याचा मोबाईल खिशातून काढला.
" अरे तुझा नंबर सांग ना. स्टोअर करुन ठेवतो. भेटू पुन्हा कधीतरी निवांत. "
मी त्याला नंबर दिला, वर खिशातून माझे visiting card पण दिले. त्याने त्याचा नंबर घेण्याचा आग्रह केला. मी त्याला मला missed call द्यायला सांगितले व बोललो की नंतर save करतो. त्याने लगेचच माझ्या नंबरवर रिंग केली. मी त्याकडे दुर्लक्ष करत विजयी मुद्रेने तिथून काढता पाय घेतला. थोडे पुढे गेल्यावर त्याचा नंबरही delete करुन टाकला.

कार्यक्रमाला पोचायला थोडा उशीरच झाला होता. त्यामुळे शिव्या घालायच्या निमित्ताने ' मन्याच' माझ्या मनात होता. एकाहून एक सरस गाणी सादर होत होती पण अचानक भेटलेला ' मन्या' माझ्या मनात ठाण मांडुन बसला होता.

कार्यक्रमानंतर तंद्रीतच घरी आलो पण मन्या काही पाठ सोडत नव्हता. अंथरुणावर पडूनही मी तोच विचार करत होतो. आणि अचानक मी भानावर आलो. का वागलो मी असा? तो तर माझ्याशी वाईट वागला नाही. भूतकाळातला मन्या आणि आजचा मन्या यात जमिन अस्मानाचा फरक होता. तस आठवलं तर शाळेत असतानासुद्धा त्याने माझे वैयक्तिक काहीच नुकसान केले नव्हते. आणि आता तर ती शक्यताही नव्हती.

आज अचानक भेटल्यावरही भले मी त्याला ओळखले नाही पण त्याने मला ओळखले म्हणजे त्याने त्या आठवणींचे धागे अजून मजबूत पकडून ठेवले आहेत. माझ्याशी बोलून त्याला त्याच्या आठवणी ताज्या करायच्या असतील. मी तबला वाजवायचो याचा त्याला किती आदर होता. मी सध्या काय करतो हे त्याने केवळ उपचारापुरतेच विचारले. त्याला त्याच्याशी काहीच देणे घेणे नव्हते. त्याला केवळ त्याचा एक जुना वर्गमित्र हवा होता. चार शब्द बोलायला. अन मी कसा वागलो त्याच्याशी?

कमी शिक्षण असूनही स्वतःच्या पायावर उभा असलेला, संसारात रमलेला, वडिलांना सांभाळण्याची जाण ठेवणारा, रस्त्यात अचानक भेटूनही मला चहा पिऊयात असा शिष्टाचार दाखवणारा मन्या मला माझ्यापेक्षा जास्त सुसंस्कृत वाटला. माझ्या बेगडी सुसंस्कृतपणाची मलाच लाज वाटली. का मी त्याचा नंबर तत्परतेने delete केला? कदाचीत मी त्याला कधीच कॉल नसता केला. पण असे कितीतरी नंबर माझ्या सेलमध्ये जागा अडवून बसले असतील. मग या एका नंबरने असा किती फरक पडला असता?

आज माझा नंबर त्याच्याकडे आहे. त्याचा माझ्याकडे नाही. माझ्याशी संबंध ठेवायचे की नाही हे आता तो ठरवणार.. त्याला मी पराभूत करायला गेलो पण खरा पराभूत मीच आहे.. तो जिंकल्याचे किंवा मी हरल्याचे दुःख नाही, पण काहितरी हरवल्याची बोच मात्र कायम राहील....

Tuesday, February 07, 2006

जाता जाता सहजच

आपणही आरंभशूर ठरतोय की काय असं वाटायला लागलं होतं.. ब्लॉगची सुरुवात तर उत्साहात केली होती पण नंतर मात्र गाडी अडकली.. पण काल सचिनने ज्या मनोनिग्रहाने ( बापरे! केवढा जड शब्द!! ) शतक मारले त्या मनोनिग्रहाने मला विचार करण्यास भाग पाडले..

मी नियमीतपणे ब्लॉग नाही लिहू शकत कारण ऑफिसात कामाचा ताण, घरी छकुलीची गडबड.. असो कारणं एक ना अनेक.. विचाराअंती एवढेच जाणवते की ब्लॉगवर लिहिणे ही माझी priority नाहिये हेच खरं कारण आहे.. ऑफिस, छकुली ही सारी निमित्तं आहेत..

एखादी गोष्ट न करण्याला अगणित कारणं असू शकतात पण ती गोष्ट करायला ती गोष्ट करायचीच आहे एवढे एक कारण पुरेसे असते.. तर असो याच मनोनिग्रहाने मी ब्लॉग अपडेट ठेवायचे ठरवले आहे.

काल सचिनने एक दिवसीय सामन्यातील एकोणचाळिसावे शतक पूर्ण केलं. गेल्या आठवड्यात कराची कसोटी सामन्यानंतर " नेमेची येतो पावसाळा " प्रमाणे सर्व प्रसार माध्यमांनी एकच हाकाटी सुरु केली " सचिन संपला " . मला खात्री होती की दरवेळेप्रमाणेच सचिन तोंडाने न बोलता त्याच्या खेळीनेच उत्तर देणार आणि काल त्याचे शतक झाले. दुसरा एक मैलाचा दगड त्याने काल पार केला तो म्हणजे एकदिवसीय सामन्यात चौदा हजार धावांचा टप्पा त्याने ओलांडला.

सचिन एखादी इनिंग खेळला नाही की प्रसारमाध्यमे त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरु करतात. सचिन संपला अशी आवई उठवतात. opinion polls चे पीक येते. परवा तर एका वाहिनीने त्यांची खेळणार्‍या अकरा खेळाडूंची यादी तयार केली त्यात सचिनला स्थान नव्हते. ही सचिनची अवहेलना नसून त्या वाहिनीने स्वतःचे करुन घेतलेले हसू होते. असो त्यांना त्यांची भाकरी भाजून घेण्यासाठी असे तवे पेटवावेच लागतात.

सचिन हा महान खेळाडू आहे हे नव्याने सांगण्याची गरजच नाहिये. वाढत्या वयोमानानुसार आणि दुखापतीमुळे तो एक ना एक दिवस निवृत्त होणार हे सुद्धा नक्की. सचिन परत पुर्वीच्या भरात येणार नाही हे सत्य आहे. पण तो एवढा परिपक्व आहे की हे निर्णय तो स्वतः घेईल, योग्य वेळेस घेईल. कुठल्याही विक्रमाची वाट बघत त्याला संघात खेळवण्याची आवश्यकताच भासणार नाही. तो स्वतः कधीच विक्रमासाठी खेळला नाही. तो खेळत गेला आणि विक्रम त्याच्या पायाशी लोळण घेत गेले.

सचिनने त्याच्या झंझावाताची इतकी सवय लावली होती की त्याचे आता झुळुकी सारखे येऊन प्रसन्न करुन जाणे लोकांच्या पचनी पडत नाहिये. कोणत्याही गोष्टीचे व्यसन वाईटच. सचिनने आम्हाला त्याने केलेले विक्रम बघायचे व्यसन लावले.भारतीय संघ खेळत असताना, अकराजण शरीराने सामना खेळत असतात तर कोट्यवधी लोक तेंव्हा मानसिक सामना खेळत असतात. मोठी स्वप्न रचत असतात. सचिनसारख्यांनीच जनतेला मोठी स्वप्न पाहायची सवय लावली हाच कदाचीत त्यांचा दोष असू शकतो.

सचिनच्या तंत्रावर बोलण्याची माझी पात्रता नाही परंतू सध्या निरीक्षणातून एक गोष्ट लक्षात आली ती अशी की सध्या तो half-cock खेळतोय. जे त्याला त्रासदायक ठरतंय. bat-pad मध्ये gap राहून तो सध्या वारंवार त्रिफळा बाद होतो. कालही नावेदच्या एका चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला परंतू सर्वांच्याच सुदैवाने तो नोबॉल होता. आणि अशी ही सुदैवाची कुबडी सचिननं घेणं हीच गोष्ट पचनी पडत नाही. टेनिस एल्बो ची दुखापत असेल किंवा अजून काहिहि कारण असेल त्याचे या तंत्राने खेळण्यामागे पण ते सदोष आहे असं मला वाटते. असो.

सचिन हा उर्जेसारखा आहे. जो संपणार नाही.. कदाचीत उर्जेसारखाच एका अवस्थेतून दुसर्‍या अवस्थेत त्याचे रुपांतर होईल......

Wednesday, January 11, 2006

सांजवेळ

सांजवेळ.. दिवस आणि रात्र यांच्या सीमारेषेवरचा हा समय.. खरंतर प्रत्येक संध्याकाळ हा एक वेगळाच अनुभव असतो.. बदलत्या ऋतूप्रमाणे या सांजवेळांनाही स्वतंत्र व्यक्तीत्व असते.. उन्हाळ्यात ती संध्यामधुरा असते, पावसाळ्यात ती काजळमाया असते तर हिवाळ्यात ती गुलाबी थंडीपासून बचाव करण्यासाठी लोकरीची शाल पांघरुन आल्यासारखी भासते.

उन्हं कलंडून सावल्या लांबल्या की तिची चाहूल लागते.. सलज्ज तरूणी सारखी ती क्षितीज आरक्त करून हलकेच येते.. प्रियकराला भेटण्याच्या ओढीने येणार्‍या खट्याळ प्रेयसीचा आवेग तिच्या येण्यात भासतो.. दीनकराच्या अस्ताबरोबरच तिचे अस्तीत्व अधिकच गहिरे बनते.. सोबतीला चंद्र, चांदण्या आल्यावर तर ती एखाद्या माहेरवाशीणी सारखी अल्लडपणे बागडते.. पण...... तिचा हा अवखळपणा बघायलाच निशाराणी येते अन तिच्या चाहूलीनेच ही षोडषवर्शी भासणारी संध्याकाळ बावरते... कोमेजून जाते.. निशाराणीच्या आगमनाने तिचे अस्तीत्वच मिटते.. दररोज एक अनामिक हुरहुर लाऊन सांजवेळ निघून जाते.....

आपल्या आयुष्यातही अनेक घटना, अनेक व्यक्ती अशा सांजवेळेसारख्याच येऊन जातात.. त्यांची सोबत कधीच संपू नये असं वाटतं पण त्याही तशीच अनामिक हुरहुर लाऊन जातात..पुन्हा नव्याने भेटण्यासाठी..........

तम उमलू लागतां
सूर्य चुंबतो सागर
चांद भेटीला आतुर
सांज कोवळी अधीर

होते क्षितीज आरक्त
जेंव्हा लांबते सावली
जन्मे कुशीत उन्हाच्या
सांज सानुली तान्हुली

पंख घरट्यात येती
रिते भासते आभाळ
चारी दिशांना वेढते
सांज मोहक वेल्हाळ

मंद चांदण्या फुलती
गोड गाणे बहरते
होतां चाहूल रातीची
सांज मुकी बावरते

रात्र उतरतां दारी
विझे सागर निळाई
किती खेळही निराळा
सांज निसटूनी जाई

Tuesday, January 03, 2006

दिंडी

मुक्तीची आस मनी घेऊन
पाखरु उडाले सोडून कुडी
गांवकुसाची वेस ओलांडून
चालली संवेदनांची दिंडी

रामनामाचा गजर सभोवती
गर्द आभाळ चांदण्या विरक्त
एकमेका छेदत उंच लपेटती
आकाशी केशरी ज्वाळा आरक्त

प्रकाश अंधाराच्या वेशीतून
नश्वराचा ईश्वरी प्रवास
आपल्याच रंगात तल्लीन
बधीर जाणीवा मन उदास

वाट पावलात अडखळली
जेंव्हा वेळ झाली परतीची
पाप - पुण्य वजा करता
राख उरली आयुष्याची....